भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) (1 जून 1953 – 21 ऑगस्ट 2024) संस्थापक – "होलार समाज मानवता मंदिर", बोपोडी प्रेरणास्थान व मुख्य सल्लागार – "होलार समाज सामाजिक संस्था" होलार समाजाचे भिष्म पितामह, आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) यांचे 21 ऑगस्ट 2024 रोजी दुःखद निधन झाले. समाजाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाने मागे एक अपार सामाजिक कार्याचा वारसा सोडला आहे. मुळचे नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील असलेल्या गुरुजींनी 1976 मध्ये पुणे महानगरपालिका शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. पण त्यांची खरी ओळख समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याची होती. 1980 मध्ये "होलार समाज मानवता मंदिर" या महाराष्ट्रातील पहिल्या समाज मंदिराची स्थापना करून त्यांनी समाजजागृतीचा विडा उचलला. 1980 ते 1997 या काळात अंगणवाडी व बालवाडी चालवून समाजातील लहानग्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी व्यसनमुक्ती अभियान राबवले आणि असंख्य समाज बांधवांना नवजीवन दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत 1985 साली पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" बहाल केला. गुरुजींनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून, अनेक बांधवांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी होलार समाजाला एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे समाजाला बंधुता, प्रेम, शिक्षण व समानतेचे मूल्य लाभले. त्यामुळेच संपूर्ण समाजाने त्यांना "भिष्म पितामह" आणि "समाजभूषण" अशा पदव्या बहाल केल्या. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर समाजासाठी अर्पण करणाऱ्या या थोर व्यक्तीचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने होलार समाजाने एक आधारस्तंभ गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचे कार्य आमच्यासाठी सदैव दीपस्तंभ राहील.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-